
Sanjay Raut : “आम्ही एकत्र आलो, तर त्यांनी एकत्र येण्यात गैर काय?”; राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया
मुंबई | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील ऐतिहासिक युतीची केवळ औपचारिक घोषणा बाकी असताना, दुसरीकडे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. यावर भाष्य करताना शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी, “आम्ही एकत्र आलो आहोत, तर काका-पुतणे एकत्र आले तर आम्ही टीका का करावी?” असे म्हणत या संभाव्य युतीला एकप्रकारे मूकसंमतीच दिली आहे.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची ‘वज्रमूठ’?
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, “पुण्याबाबतचा निर्णय हा त्या दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, जर आम्ही (ठाकरे गट आणि मनसे) राजकीय आणि भावनिक दृष्टिकोनातून एकत्र आलो असू, तर त्यांनी एकत्र येण्यावर टीका करणे मला योग्य वाटत नाही.” राऊतांच्या या विधानामुळे पुण्यात ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ एकाच मंचावर दिसण्याची शक्यता बळावली आहे.
ठाकरे बंधूंचे जागावाटप अंतिम टप्प्यात
संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले,मुंबईसह प्रमुख शहरात जागावाटप पूर्ण: मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम झाली आहे.अनेक ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही सुरू झाले असून, कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे.”दोन्ही भाऊ एकत्र येणे आता निश्चित आहे, फक्त त्याची अधिकृत घोषणा कधी करायची, एवढाच तांत्रिक मुद्दा शिल्लक आहे,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
“जिवंत माणसांचे राज्य, आम्ही लढत राहणार!”
भाजपवर हल्ला चढवताना राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. “देशात लोकशाहीचा गळा घोटला जात असताना गप्प बसणे ही राष्ट्रीय आत्महत्या ठरेल. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांना सत्ताधारी पायाखाली तुडवत आहेत. अशा वेळी जिवंत माणसे गप्प बसू शकत नाहीत. महाराष्ट्र हे जिवंत माणसांचे राज्य आहे आणि आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


