
Asim Sarode On Election Commision : सरोदेंची निवडणूक आयोगाला ‘पारदर्शकते’ची विनंती; “पहिल्या टप्प्याचे निकाल 20 डिसेंबरपर्यंत रोखावे.”
मुंबई :- राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, निवडणुकीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने Election Commision काही नगरपरिषदा आणि प्रभागांतील निवडणुकांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता राज्यात 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ वकील असीम सरोदे Advocate Asim Sarode यांनी ट्विट करत एक महत्त्वाची मागणी केली आहे.
सरोदे यांची मागणी काय?
सरोदे यांनी निवडणुकीतील पारदर्शकतेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,”नगर परिषद व नगरपंचायतीच्या काही निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगित केल्या आहेत. आपोआपच आता या निवडणुकांचा दुसरा मतदान टप्पा 20 डिसेंबर रोजी होणार. या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे की 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यावर तेथील नगर परिषद व नगरपंचायतीचे निकाल लगेच 3 डिसेंबरला जाहीर न करता सगळे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करावेत.”
निवडणूक आयोगाने तसे करणे, ‘पारदर्शक व मोकळ्या वातावरणात प्रामाणिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी’ या कायदेशीर बंधनकारक जबाबदारीचा भाग आहे, असे सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. एका टप्प्यातील निकाल आधी लागल्यास, त्याचा दुसऱ्या टप्प्यातील मतदारांवर किंवा राजकीय पक्षांच्या व्यूहरचनेवर परिणाम होऊ शकतो, हे या मागणीमागचे मुख्य कारण आहे.
भाजपचीही नाराजी
दरम्यान, निवडणूक आयोगाने अचानक निवडणुका पुढे ढकलल्याने यावर भाजपनेही नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “हे चुकीचं असल्याचं” मत व्यक्त केले होते. अचानक निवडणुका पुढे ढकलल्याने संबंधित उमेदवारांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला असून त्यांची प्रचाराची मेहनत वाया गेली आहे.



