
Devendra Fadnavis On Election : “उद्या निवडणूक, आज स्थगिती देणे अत्यंत चुकीचे!” – फडणवीस; प्रचाराची मेहनत वाया गेल्याची उमेदवारांची भावना
मुंबई: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे अचानक पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या Election निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोग कायद्याचा चुकीचा अर्थ लावत असल्याचा थेट आरोप फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, “निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय, ते मला माहित नाही. माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही.”
‘उमेदवारांची मेहनत वाया गेली’
या निवडणुका पुढे ढकलणे अत्यंत चुकीचे आहे, अशी भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली. “उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचे आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली.” निवडणूक आयोग स्वायत्त असला तरीही अशाप्रकारे निर्णय घेणे चुकीचेच आहे आणि याबद्दल निवडणूक आयोगाला प्रतिनिधित्व दिले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
स्थगित झालेल्या प्रमुख निवडणुका (22 नगराध्यक्षपद)
अमरावती विभाग: बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा, वाशिम.
कोकण विभाग: अंबरनाथ.
छत्रपती संभाजीनगर विभाग: फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत.
नागपूर विभाग: घुग्घूस, देवळी.
नाशिक विभाग: देवळाली-प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा.
पुणे विभाग: बारामती, फुरसुंगी-उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर.
स्थगित झालेल्या या सर्व ठिकाणी आता 20 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस
दरम्यान, ज्या 278 पैकी 253 नगराध्यक्षपदांसाठी उद्या (2 डिसेंबर) मतदान होणार आहे, त्या ठिकाणी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि बीडमध्ये महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.


