
Sharad Pawar Letter News : अकोल्यात शेतकरी संवाद कार्यक्रमात अनोखी मागणी; ग्रामीण तरुणांना मुली न मिळण्याचे भीषण वास्तव समोर
अकोला :- राज्यात विशेषतः ग्रामीण भागात तरुणांच्या लग्नाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. असंख्य सुशिक्षित तरुण अविवाहित असून त्यांना लग्नासाठी जोडीदार मिळत नसल्याने सामाजिक अडचणी वाढत आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर, अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांना पत्र लिहून लग्न लावून देण्याची अनोखी विनंती केली आहे. “आपले उपकार जन्मभर विसरणार नाही,” असेही त्याने पत्रात नमूद केले आहे. या मागणीमुळे राज्यात तरुणांच्या लग्नाच्या समस्येचे भीषण स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.

शरद पवार हे शनिवारी अकोला येथे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी शेतकरी, नागरिक आणि तरुणांकडून विविध निवेदने व पत्रे स्वीकारली. याचवेळी त्यांना प्राप्त झालेल्या निवेदनात एका ‘लग्नाळू तरुणाच्या’ अनोख्या मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातील तरुणांना किंवा शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे भीषण वास्तव दिसून येते. ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलींची संख्या वाढल्यामुळे आणि त्यांच्या अपेक्षा वाढल्यामुळे शहरी भागातील नोकरदार तरुणांना मुलींची पसंती अधिक आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. या गंभीर समस्येमुळे त्रस्त झालेल्या या तरुणाने आता थेट राज्याच्या ज्येष्ठ नेत्याकडे आपली व्यथा मांडली आहे.


