
Rahul Gandhi On Election Commission : ’93 हजार बेघर मतदारांचा दावा खोटा’; ‘बेघर’ मतदारांकडे मोठी घरे, ब्राझिलियन मॉडेलच्या ‘बोगस’ मतदानाचाही केला पर्दाफाश
ANI :- लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी आज (बुधवार) नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळाचे धक्कादायक पुरावे प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. ज्या मतदारांच्या घराचा क्रमांक शून्य (House No 0) आहे, ते बेघर आहेत, हा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत देशात तब्बल 93 हजार बेघर मतदार असल्याचे म्हटले होते. या मतदारांकडे राहण्यासाठी घर नसल्याने त्यांच्या पत्त्यावर घराचा क्रमांक ‘0’ लिहिला जातो. ज्ञानेश कुमार यांच्या या दाव्यावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात की, काही लोकांकडे घर नसतं आणि ते जिथे झोपतात ती जागा यांचा पत्ता हाऊस नंबर 0 असतो. आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा हरियाणातील हाऊस नंबर 0 पत्ता असणाऱ्या मतदाराची ओळख पटली. मात्र, प्रत्यक्षात या व्यक्तीचे गावात मोठे घर होते.
राहुल गांधी यांनी आरोप केला की, हाऊस नंबर 0 पत्ता असलेले हे मतदार निवडणूक झाल्यानंतर सापडत नाहीत, ते मतदान होताच गायब होतात. “ज्ञानेश कुमार खोटं बोलत आहेत. मतदार यादीतील ही गोष्ट चूक नाही, तर जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे,” असे गंभीर विधान राहुल गांधी यांनी केले. तसेच, ‘बेघर’ व्यक्तींचे कपडे पाहून ते बेघर नाहीत, हे स्पष्टपणे लक्षात येते, असेही ते म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढून टाकण्यासाठी सॉफ्टवेअर आहे, पण ते ते का वापरत नाहीत? यासाठी एआयचीही आवश्यकता नाही; ते काही सेकंदात ते काढून टाकू शकतात, पण ते असे करत नाहीत कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे, असा आरोप त्यांनी केला. हा ठोस पुरावा आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी एका ब्राझिलियन मुलीचा (मॉडेलचा) फोटो दाखवला आणि विचारले, “निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?” ते म्हणाले की, या ब्राझिलियन मुलीने हरियाणा विधानसभा निवडणुकीत 10 वेळा मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी आयोगाच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे.


