
Sanjay Raut On Bacchu Kadu : ‘सातबारा कोरा ही उद्धव ठाकरे यांची भूमिका’; एमसीए आणि क्रिकेटमधील राजकारणावरही राऊतांनी साधला निशाणा
मुंबई :- राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू, Bacchu Kadu शेतकरी नेते राजू शेट्टी, अजित नवले, रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कालपासून एल्गार पुकारला आहे. हजारो शेतकरी आणि अपंग बांधव रस्त्यावर ठिय्या देऊन बसले आहेत, ज्यामुळे उपराजधानीसह मध्य भारताला जोडणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज होणाऱ्या बड्या राजकीय घडामोडींअगोदर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी मोठे विधान केले आहे.
कर्जमाफी आणि ‘सातबारा कोरा’ मागणी
जोपर्यंत कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याविषयी सरकार ठोस भूमिका जाहीर करणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, कडू हे लढवय्ये नेते आहेत.
राऊतांचा दावा: “बच्चू कडूंना आता सातबारा कोरा करण्यात जर यश मिळालं तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. कारण सातबारा कोरा करणं आणि कर्जमाफी या संज्ञा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या आहेत,” असा दावा त्यांनी केला.
आग्रही भूमिका: सातबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी जाहीर केली होती. आताही त्याच पद्धतीने कर्जमाफी व्हायला हवी, ही आमच्या सर्वांचीच भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.
क्रिकेटमधील राजकारणावर टीका
एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) राजकारण आणि राजकारण्यांपासून दूर ठेवण्याची मागणी होत असताना, राऊत यांनी यावरही भाष्य केले. एकेकाळी चांगले क्रिकेटर्स आणि प्रशासक एमसीएमध्ये होते, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये क्रिकेटर्सचा बाजार झाल्याचे ते म्हणाले.
“भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम शरद पवार यांनी केले. त्यानंतर अनेकांचे डोळे क्रिकेटकडे वळले,” असे राऊत म्हणाले.
भाजपने क्रिकेटशी संबंध ठेवला नव्हता, पण गेल्या तीन ते चार वर्षात तो वाढला आहे. “प्रत्येकाला असं वाटतंय की क्रिकेट हा ऑल पार्टी बोर्ड आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.
‘सत्याचा मोर्चा’ आणि विरोधी पक्षांची बैठक
मतदार यादीतील कथित घोटाळ्याविरोधात 1 नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या ‘सत्याच्या मोर्चा’बाबतही संजय राऊत यांनी माहिती दिली. या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी आज दुपारी 12 : 30 वाजता विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह इतर अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.



