BJP Operation Lotus : सोलापुरात भाजपचा ‘ऑपरेशन लोट्स’ यशस्वी; राष्ट्रवादीचे दोन माजी आमदार भाजपत दाखल

•आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षावर कुरघोडी; ‘आता आम्ही स्वबळावर लढू’ – राजन पाटील
मुंबई :- आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचा वरचष्मा राखण्यासाठी भाजपने सोलापूर जिल्ह्यात मोठी खेळी खेळली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत ‘ऑपरेशन लोट्स’ यशस्वी केल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे दोन माजी आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यासोबतच लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनीही भाजप प्रवेश केला. माजी आमदार बबनदादा शिंदेंचे पुत्रही भाजपमध्ये दाखल झाले आहेत, ज्यामुळे भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे.
राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर
भाजप प्रवेशानंतर राजन पाटील आणि यशवंत माने या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजीवर तीव्र टीका केली. राष्ट्रवादीत आता शिस्त राहिली नाही, म्हणूनच आपण पक्ष सोडल्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी दावा केला की, भाजप आता ‘सोलापूरमय’ झाले असून, जर भाजपने सोलापुरात एकट्याने लढत दिली, तर कमळ नक्कीच फुलेल. महायुतीत लढल्यास इतर पक्षांतील सहकाऱ्यांना फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी आमदार यशवंत माने यांनी मतदार संघातील कुरघोडीमुळे कंटाळलो होतो, असे सांगितले. आमदार असताना चांगले वागणे आणि आमदार नसताना वेगळी वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, मतदारसंघातील विकासासाठी निधी मिळत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री गोरे यांची सावध प्रतिक्रिया
या धक्कातंत्रावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. आपण कोणाला धक्का दिला नाही, असे सांगत, ज्यांना आमच्याकडे यायचे आहे ते स्वतःहून येत आहेत, असे ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही वितुष्ट येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीबाबतचे निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.



