
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : ठाण्यात ठाकरे गट-मनसेचा संयुक्त मोर्चा; शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका
ठाणे :- ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, खड्डे आणि पाणी प्रश्नावरून तसेच महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या वतीने ठाण्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. ठाण्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या या मोर्चातील जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी शिंदे गटावर तुफान टीका केली.
रामदास कदम यांच्या ‘बार’वर निशाणा
जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. कदम यांच्या कथित बारचा मुद्दा उपस्थित करत जाधव म्हणाले:
“बायका नाचवायच्या, त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे, रामदास कदमांनी. रामदास कदम गृहराज्यमंत्री होते म्हणतात. 30 वर्षांपूर्वीचा बार आहे असे ते म्हणतात, म्हणजे 30 वर्षे छमछम सुरु होती… तुम्ही बारमध्ये बारबाला नाचवता आणि तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणरड्या तोंडाने तुम्ही मातोश्री बद्दल बोलता.”
एकनाथ शिंदेंवरही टीका
जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “तुम्ही मातोश्रीबद्दल बोलताना तुमच्या जीभा झडल्या पाहिजेत, त्यांचे तुकडे पडले पाहिजेत. शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूचे अशा पद्धतीने राजकीय भांडवल का? जर एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांचे असते तर त्यांनी रामदास कदम यांची जीभ हसडायला पाहिजे होती. पण ते मात्र कुठे काय झालं नाही.”
‘मोदी-शहांसमोर जी हुजूर’
हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना जाधव यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. “हिंदी भाषा सक्तीविरोधात मराठी लोक एकत्र आले. पण एकनाथ शिंदे, तुमचा पक्ष कुठे होता? तुम्हाला फक्त आणि फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर जी हुजूर… आज्ञा हुजूर करायचे आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
ठाण्यातील गडकरी रंगायतन ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता. यात भास्कर जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.


