
मुंबई : शिवतीर्थावरील दसरा मेळावा म्हणजे केवळ परंपरा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘सुपर पॉवर शो’ असतो. कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी प्रचंड जनसमुदायासमोर भाषणाचा असा गडगडाट केला की, सगळा माहोल पेटून उठला!
‘राज-उद्धव’ एकत्र – मराठी मतांचा महामेळावा!
“हिंदीला आम्ही विरोध नाही, पण हिंदीची सक्ती केली तर मराठी माणूस पेटून उठेल. मी आणि राज ठाकरे मराठीसाठी एकत्र आलो आहोत, आणि हे एकत्र येणं कायमचं आहे!” – उद्धव ठाकरेंच्या या जाहीर वक्तव्याने मैदानात घोषणांचा तुफान स्फोट झाला.
‘हिंदुत्व भाजपच्या पायातलं भोंगळ सोंग!’
भाजपवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरे म्हणाले –
“भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवणार? ज्यांना हिंदुत्वाचा अर्थच कळत नाही, ते आम्हाला धडे देतील? ढोंगबाज हिंदुत्वाचे मुखवटे काढा! शिवसेना हे खरे हिंदुत्व आहे.”
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर ‘सस्पेन्स’
“मुंबई महापालिकेची निवडणूक होईल की नाही यावरच शंका आहे. भाजपला महापौर हवा म्हणून मुंबईत हिंदू-मुस्लीम फूट पाडण्याचा नंगा नाच सुरू आहे. पण मुंबईकर भाजपच्या या भयानक डावाला कधीच बळी पडणार नाहीत.”
‘मुंबईचा विचका केला रे तुम्ही!’
रस्त्यावरील खड्ड्यांपासून पाणी-वीज संकटांपर्यंत मुंबईकरांच्या जळजळीत प्रश्नांवर उद्धव ठाकरे संतापले
“मुंबईचा विचका केला आहे! शिंदे-फडणवीस सत्तेत बसून फक्त खुर्च्या गरम करतायत. पण मुंबईचा सर्वनाश केला आहे.”
“2017 मध्ये कर्जमाफीचं ढोल वाजवलं, पण शेतकरी अजूनही कर्जासाठी रडतोय. मी मुख्यमंत्री असताना खरी कर्जमाफी दिली. भाजप फक्त घोषणा करतो – प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फसवतो.”
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत ठाकरेंनी थेट इशारा दिला –
“शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल!”
शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे सरकारला अक्षरशः चिरडून टाकलं.
मराठीचा मुद्दा हातात घेऊन राज-उद्धव एकत्र हिंदुत्वाच्या ढोंगावर भाजपला थेट झापड
मुंबई-शेतकरी प्रश्नांवरून सरकारला इशारा


