
Thane Latest News : 29 सप्टेंबरसाठी ऑरेंज, 30 साठी यलो अलर्ट; सर्व विभागप्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश.
ठाणे :- प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी 28 सप्टेंबर रोजी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, अतिवृष्टीमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. 29 सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट आणि 30 सप्टेंबरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Thane Weather Update
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व विभागांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यातील दळणवळण आणि जीवितहानी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
प्रत्येक विभागाला ‘क्विक ॲक्शन’ निर्देश
सार्वजनिक बांधकाम विभाग: रस्त्यांवर पडलेली झाडे तातडीने बाजूला करण्यासाठी वूड कटर आणि जेसीबी यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच, दरडी कोसळल्यास तात्काळ कार्यवाही करण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ तयार ठेवण्याचे आदेश आहेत.
मत्स्यव्यवसाय विभाग: मच्छिमारांना हवामानाचा अचूक अंदाज कळवावा आणि त्यांना समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापासून रोखावे.
इतर विभाग: सर्व विभागांनी आपत्कालीन व्यवस्थापनाची साधने सुस्थितीत ठेवावीत आणि शोध व बचाव पथकांना तयारीत ठेवावे.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि नागरिकांना ‘दामिनी ॲप’ आणि ‘सचेत ॲप’ डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ॲप्समुळे त्यांना विजा पडण्याची आणि हवामानाची आगाऊ माहिती मिळू शकणार आहे.
या कालावधीत सर्व विभागांनी एकमेकांशी उत्कृष्ट समन्वय साधून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले आहे. कोणत्याही आपत्कालीन घटनेची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाला ०२२-२५३०१७४० किंवा ९३७२३३८८२ या क्रमांकावर कळवावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


