Jogeshwari Police News : जोगेश्वरी पोलिसांचा ‘ऑपरेशन पर्दाफाश’! ‘पाकीट बदल’ बतावणीचे मास्टरमाईंड पुण्यातून जेरबंद

Jogeshwari Police Latest News : मुख्य आरोपीवर मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आयुक्तालयांतर्गत फसवणुकीचे 81 गुन्हे दाखल; 6 गुन्हे उघडकीस!
मुंबई :- “तुमच्या बोटातील अंगठी पाकीटात सुरक्षित ठेवा,” अशी बतावणी करून लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जोगेश्वरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन सराईत आरोपींना पुणे येथून अटक केली असून, त्यांच्या अटकेमुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील फसवणुकीचे सहा मोठे गुन्हे उघड झाले आहेत.
‘पाकीट बदल’ बतावणीची पद्धत
दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी जोगेश्वरी रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरातून पायी जाणाऱ्या एका तक्रारदाराला दोन अज्ञात इसमांनी गाठले. बोलण्यात गुंतवून त्यांनी तक्रारदाराच्या बोटातील सुमारे 3 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या ‘पाकीटात ठेवून सुरक्षित’ ठेवण्याचा बहाणा केला. मात्र, हातचलाखीने अंगठ्या पाकीटात न ठेवता त्या चोरून नेल्या आणि तक्रारदाराची फसवणूक केली. या घटनेनंतर जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून अटक
या गुन्ह्याच्या तपासासाठी जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी तांत्रिक तपासाचा आधार घेतला. अखेर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पथकाने थेट पुणे गाठले. पिंपरी चिंचवड आणि मुंढवा परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपी रमेश विजयकुमार जैस्वाल (46 वय) आणि निलेश चंद्रकांत घाग (33 वय ) या दोघांना अटक केली.
गुन्हेगारीचा धक्कादायक विक्रम
अटक केलेले हे दोन्ही आरोपी नुसते चोर नसून, फसवणुकीच्या गुन्ह्यातील मास्टरमाईंड आहेत. आरोपी क्रमांक 1 रमेश जैस्वाल याचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड अतिशय धक्कादायक आहे. त्याच्याविरोधात मुंबई शहर, ठाणे, आणि मीरा-भाईंदर-वसई-विरार या प्रमुख आयुक्तालयांतर्गत बतावणी आणि फसवणुकीचे तब्बल 81 गुन्हे दाखल आहेत.
या आरोपींकडून पोलिसांनी तक्रारदाराच्या 3 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या दोन्ही सोन्याच्या अंगठ्या (एकावर पिवळा एकराज खडा, तर दुसऱ्यावर लाल मुंगा खडा) हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकोला, बोरिवली, कल्याण आणि डोंबिवली येथील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीमुळे मुंबई आणि उपनगरात ‘पाकीट बदल’ करणाऱ्या या सराईत टोळीचा पर्दाफाश झाला आहे.



