Latur Earthquake : लातूर जिल्ह्यात पुन्हा ‘भूकंप’; बोरवटी गावात 2.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे सौम्य धक्के

•प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
लातूर :- लातूर जिल्ह्याच्या मौजे बोरवटी गावात आज (शुक्रवार,26 सप्टेंबर,) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक जमिनीला हालचाल जाणवल्याने नागरिक त्वरित घराबाहेर आले.
स्थानिक प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांच्याकडे चौकशी केली. भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लातूर जिल्ह्यात 2.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप नोंदवण्यात आला आहे.
घाबरून न जाता सतर्क राहा
तज्ज्ञांनी हा धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तरीही भूकंपाचा जुना इतिहास असलेल्या लातूर जिल्ह्यात, विशेषत: 1993 च्या विध्वंसक भूकंपानंतर, अशा घटनेनंतर नागरिकांमध्ये तातडीने भीतीचे वातावरण निर्माण होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने बोरवटी गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
प्रशासनाकडून महत्त्वाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विशेष पथके तयार ठेवण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
