
• निवडीचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन; अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ही निवड यथार्थ, पाटील यांची लेखणी प्रेरणादायी’
मुंबई: 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारा जिल्ह्यालाही त्यांनी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू आणि वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन आहे. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर सातारा येथे नियोजित 99 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड यथार्थ अशीच आहे.”
पाटील यांच्या लेखणीचे कौतुक करताना ते म्हणाले, “पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून विविध आणि कसदार साहित्यकृतींची निर्मिती केली आहे. त्यांच्या लेखणीमुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली असून, ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरू लेखकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
पाटील यांनी ‘पानिपत’ या कादंबरीसह अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.


