Badlapur Crime News : 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून 12 लाखांची खंडणी; बदलापूर पोलिसांकडून 3 आरोपींना अटक

Badlapur Latest Crime News : गुजरातमध्ये गणपती दर्शनादरम्यान झाली घटना; पोलिसांनी 4 दिवसांत सुटका करून मुलाला आईकडे परत आणले
बदलापूर :– गणेशोत्सवासाठी गुजरातमध्ये वडिलांच्या गावी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचे त्याच्याच ओळखीच्या लोकांनी अपहरण करून त्याच्या आईकडे 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, बदलापूर ग्रामीण पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत, चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर तीन आरोपींना अटक केली आणि मुलाला सुखरूप त्याच्या आईच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. Badlapur Latest Crime News
गणपती दर्शनाच्या नावाखाली अपहरण
वांगणी येथील एका महिलेचा अल्पवयीन मुलगा 31 सप्टेंबर रोजी गुजरातमधील वडिलांच्या गावी (मडोसा) गणेशोत्सव पाहण्यासाठी गेला होता. तेथे त्याने आपल्या ओळखीच्या लोकांना भेटून गणपती दर्शनासाठी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. याच संधीचा फायदा घेऊन आरोपींनी त्याला एका चारचाकी गाडीतून जंगलात पळवून नेले आणि डांबून ठेवले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या आईला फोन करून त्याच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची खंडणी मागितली.
पोलिसांनी धाडली दोन पथके
घाबरलेल्या आईने तात्काळ बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी तात्काळ दोन पथके गुजरातला रवाना केली.
पोलिसांनी तपास सुरू केल्याची कुणकुण लागताच आरोपी घाबरले. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मुलाला एका बस थांब्यावर सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांचा तांत्रिक तपास सुरूच होता. या तपासणीतून पोलिसांनी मडोसा येथून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण खैर, नरेश खैर आणि अनिल खैर या अन्य दोन आरोपींना राजस्थान सीमेजवळून अटक करण्यात आली.
मुलानेही दाखवले धाडस
आरोपींनी सोडल्यानंतर पुन्हा पकडले जाण्याच्या भीतीने मुलाने आपला मोबाईल बंद केला. त्याने कोणत्याही वाहनाची मदत न घेता धाडसाने पायी चालत चाळीसगाव येथील आपल्या मामाचे गाव गाठले. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक मदतीने तीन दिवसांनंतर त्याला चाळीसगाव येथून सुखरूप ताब्यात घेतले आणि बदलापूर येथे त्याच्या आईकडे परत आणले.
केवळ पैशांच्या हव्यासापोटी हे कृत्य करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी सांगितले. या यशस्वी तपासात पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम, अनंता पाटील, कनोजे, परमार आणि काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीमुळे मुलाला पुन्हा त्याचे कुटुंब मिळाले आहे.



