
Prabhadevi Old Bridge Closed : पुनर्वसनाच्या मागणीमुळे प्रकल्पाला विलंब; अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्ग काढला
मुंबई :- वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत मुंबईतील प्रभादेवी येथील जुना पूल अखेर आज, शुक्रवारी रात्री 11.59 वाजल्यापासून पाडण्यासाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) फेब्रुवारीपासून यासाठी प्रयत्न केले होते, मात्र रहिवाशांच्या विरोधामुळे त्यात यश येत नव्हते. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून बाधितांच्या पुनर्वसनाचा मार्ग काढल्यामुळे हा पूल पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Prabhadevi Traffic Update
20 महिन्यांसाठी वाहतुकीत बदल
हा पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान 20 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या संपूर्ण कालावधीसाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
विरोध आणि पुनर्वसनाचा प्रश्न
हा पूल फेब्रुवारीमध्येच पाडण्यात येणार होता, पण विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे हे काम पुढे ढकलण्यात आले. प्रकल्पातील बाधित रहिवाशांनी त्यांच्या योग्य पुनर्वसनाचा ठोस निर्णय झाल्याशिवाय पूल बंद होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती.
बुधवारी जेव्हा वाहतूक पोलिसांनी पूल बंद करण्याचे फलक लावले, तेव्हा रहिवाशांनी रस्त्यावर उतरून जोरदार विरोध केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेव्हा पूल बंद करण्यात आला नव्हता.
शिंदे यांची मध्यस्थी
या प्रकरणानंतर गुरुवारी, बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासंबंधी अनेक बैठका झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी बाधित दोन इमारतींतील रहिवाशांना त्याच परिसरात म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये घरे देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. या निर्णयामुळे रहिवाशांचा विरोध मावळला असून, आता पूल पाडण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.


