Maharashtra Sarkar : कामगारांना दिवसाला 12 तास काम करण्याची मुभा, मंत्रिमंडळाची दुरुस्तीला मंजुरी

Maharashtra Sarkar On Kamagar : कारखान्यात कामाची वेळ वाढली, ‘ओव्हरटाईम’ची मर्यादाही वाढणार
मुंबई :- महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्याबरोबरच रोजगार संधी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता कारखान्यांमधील कामगारांना दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची मुभा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण बदलाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
काय आहेत महत्त्वाचे बदल?
दैनिक कामाचे तास: आता कामगार दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करू शकतील.
साप्ताहिक कामाचे तास: आठवड्याच्या कामाचे तास 48 वरून 60 तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
ओव्हरटाईम मर्यादा: अतिरिक्त वेळेची (ओव्हरटाईम) कमाल मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
विश्रांतीचा कालावधी: कामगारांना 5 तासांनंतर 30 मिनिटे आणि 6 तासांनंतर पुन्हा 30 मिनिटे विश्रांती मिळेल.
या बदलांमुळे कामगारांना अधिक आर्थिक फायदा होईल, असा दावा सरकारने केला आहे. मात्र, सरकारने काही अटीही घातल्या आहेत.
आठवड्यात कामाचे तास 56 तासांपेक्षा जास्त झाल्यास कामगारांना एक बदली रजा द्यावी लागेल. तसेच, अतिरिक्त काम करून घेताना कामगारांना योग्य मोबदला आणि पगारी सुट्ट्या देणे बंधनकारक असेल.
दुकान आणि आस्थापनांनाही लागू:
हा बदल केवळ कारखान्यांसाठीच नाही, तर दुकाने आणि 20 पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांनाही लागू होईल. या ठिकाणी कामाचे तास 9 वरून 10 तास करण्यात आले आहेत.
सरकारची परवानगी आवश्यक
एका दिवसात कामाचे तास 12 पर्यंत वाढवले असले तरी, आठवड्याची 48 तासांची मर्यादा कायम राहणार आहे. याचा अर्थ, जर एखाद्या दिवशी 12 तास काम केले तर दुसऱ्या दिवशी कामाचे तास कमी करावे लागतील. कामगारांकडून जास्त काम करून घेण्यासाठी संबंधित शासकीय विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. या निर्णयामुळे कंपन्यांना उत्पादन वाढवण्यास मदत होईल, तर कामगारांना जास्त काम करून अधिक पैसे कमावण्याची संधी मिळेल.


