
Supriya Sule On Devendra Fadnavis : मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; फडणवीसांना 2018 च्या भाषणाची आठवण करून दिली
मुंबई :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर पोहोचलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आंदोलकांनी त्यांच्या गाडीसमोर जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी या घटनेचे समर्थन करत ‘एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय?’ असा सवाल केला.
मी लोकप्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते. लोकांच्या भावनांचा आदर करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. एखाद्या तरुणाला काही वेदना असतील तर त्या ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. तिथे फार काही झाले नाही, फक्त तरुणांनी हट्ट केला.” त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत थोडक्यात चर्चा झाली असून, त्यांनी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारने आंदोलनास्थळी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
‘शरद पवारांकडे 250 आमदार अन् 300 खासदार!’
मराठा आंदोलनामागे शरद पवार असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप खोडून काढताना सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला. “मला गंमत वाटते की, एकीकडे आम्हाला संपलं, संपलं असे म्हणतात आणि जेव्हा एवढं मोठं आंदोलन उभं राहतं, तेव्हा त्याचा केंद्रबिंदू शरद पवारच होतात,” असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “भाजपचे 250 आमदार आणि 300 खासदार असतानाही ते शरद पवारांकडे वळतात, ही कमालच आहे.”
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “सलग 11 वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत सविस्तर भाषण दिले होते आणि आरक्षण कसे देता येईल हे सांगितले होते. आज तेच सत्तेत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, जो उपाय तुम्ही 2018 साली सांगितला होता, त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी,” असे म्हणत त्यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या भाषणाची आठवण करून दिली.



