
Mumbai Maratha Arkshan Latest News : मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील एकाचा जुन्नरजवळ हार्ट अटॅकने मृत्यू, हळहळ व्यक्त
जुन्नर :- मराठा आरक्षणासाठी Maratha Arkshan अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांना आज एक मोठा धक्का बसला आहे. जुन्नरजवळ मोर्चातील एक आंदोलक, सतीश देशमुख, यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत याला थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे.
आज सकाळी जरांगे पाटील शिवनेरीवर पोहोचले. तेथून मुंबईकडे निघण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सतीश देशमुख यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली. “आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत,” असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जर सरकारने आता आरक्षण दिले, तर असे बळी जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
आठ तासांची परवानगी, पण जरांगे ठाम
मनोज जरांगे यांना पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलनासाठी केवळ आठ तासांची परवानगी दिली आहे. जरी त्यांनी ही अट मान्य केली असली तरी, शिवनेरीवर बोलताना त्यांनी वेगळीच भूमिका घेण्याचे संकेत दिले. “मराठा समाजात खूप मोठ्या वेदना आहेत, हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतले पाहिजे. आमच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “न्यायालयाने सांगितले म्हणून आम्ही परवानगी घेतली, पण एका दिवसाची आंदोलनाची परवानगी ही मराठ्यांची चेष्टा आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलनाची परवानगी देऊ शकते, पण त्यांनी जाणूनबुजून फक्त एक दिवसाची परवानगी दिली.”
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व अटी आणि शर्ती काढून टाकण्याची मागणी केली आहे. आता जरांगे आणि त्यांचे समर्थक प्रशासनाने दिलेली आठ तासांची वेळ पाळणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


