
Mumbai BJP Latest News : ‘अभ्यासू आणि आक्रमक’ नेतृत्वाखाली भाजप मुंबईत घोडदौड राखणार; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
मुंबई :- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक मोठा संघटनात्मक बदल केला आहे. आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीसाठी आणि नागरी प्रश्नांवरील पकडीसाठी ओळखले जाणारे आमदार अमित साटम MLA Ameet Satam यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात ही घोषणा करण्यात आली. Mumbai BJP Latest News
अमित साटम हे गेली अनेक वर्षे मुंबईच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते सलग तीन वेळा अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. मुंबईतील स्थानिक समस्यांची आणि राजकारणाची त्यांना चांगली जाण आहे. विधानसभा आणि इतर व्यासपीठांवर भाजपची बाजू जोरदारपणे मांडल्यामुळे त्यांची ‘अभ्यासू आणि आक्रमक’ नेता अशी प्रतिमा तयार झाली आहे. त्यांच्या या अनुभवाचा आणि शैलीचा आगामी निवडणुकीत पक्षाला फायदा होईल, या विश्वासातूनच ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अमित साटम यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मुंबईत चांगले यश मिळवले आणि पक्षाला मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून सिद्ध केले.”
फडणवीस पुढे म्हणाले, “अमित साटम यांचा प्रदीर्घ कार्यकाळ आहे. त्यांनी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांची मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल आणि पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असा मला विश्वास आहे.” त्यांनी साटम यांना शुभेच्छा देत, सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील असेही सांगितले.
कोण आहेत अमित साटम?
अमित साटम यांचा जन्म 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूटमधून व्यवस्थापनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. 2014 पासून ते सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत आहेत.



