Imtaiz jallel : जलील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही ‘चिकन बिर्याणी’चे आमंत्रण!

Imtaiz Jallel Invite CM And DCM Of Maharashtra For Biryani : 15 ऑगस्टला मांसाहार बंदीवरून राज्यात वादंग: जलील यांनी दिली ‘मटण पार्टी’ची ऑफर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही दर्शवली नाराजी
मुंबई :- स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्रीवर बंदी घालण्याच्या काही महानगरपालिकांच्या निर्णयावरून महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवली, मालेगाव, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये लागू करण्यात आलेल्या या बंदीला एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट ‘मटण पार्टी’ आयोजित करून आव्हान दिले आहे.
इम्तियाज जलील यांनी या बंदीला ‘तुघलकी फतवा’ म्हणत आपला निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी एक ट्विट करून 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता आपल्या निवासस्थानी चिकन बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीसाठी त्यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण दिले आहे. ‘भारत एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे,’ हे आठवण करून देण्यासाठी ही पार्टी आयोजित केल्याचे जलील यांनी म्हटले आहे.
या बंदीच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे की, सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि लोकांनी काय खावे किंवा काय खाऊ नये यात सरकारला रस नाही. याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. स्वातंत्र्यदिनीच लोकांच्या खाण्यावर गदा आणणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी हा नक्की कोणता स्वातंत्र्यदिन, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सर्व मांसाहारी दुकाने उघडी ठेवण्याचे आदेशही दिले आहेत.


