Raj Thackeray : दादरमधील कबुतरखान्यावरून राज ठाकरे आक्रमक

•’जैन समाजालाही न्यायालयाचा निर्णय मानावा लागेल’; मंत्री लोढांवरही निशाणा
मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दादरमधील प्रसिद्ध कबुतरखाना बंद करण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असून, जैन समाजालाही कबुतरांमुळे होणाऱ्या रोगांचा विचार करायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “कबुतरांमुळे कोणते रोग होतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. न्यायालयाने कबुतरांना खायला घालू नये असा आदेश दिला आहे. त्यामुळे जो कोणी हा नियम मोडेल, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करायलाच हवी.” दादरमध्ये जैन समाजाने केलेल्या आंदोलनावरही त्यांनी टीका करत, आंदोलकांवर कारवाई व्हायला पाहिजे होती, असे मत व्यक्त केले.
या प्रकरणात राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या मध्यस्थीवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. “लोढा-बिढा सारखे लोकं सारखे मध्ये येतात. मंगलप्रभात लोढा काही एका समाजाचे मंत्री नाहीत, ते राज्याचे मंत्री आहेत. त्यांनीही न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे,” असे सांगत त्यांनी लोढा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी राज ठाकरे यांना मराठी-मारवाडी वाद मिटवण्यासाठी साद घातली आहे. “तुम्हाला मराठी हिंदुहृदयसम्राट म्हणतात. तुम्ही मराठी-मारवाडी वाद मिटवा. आम्ही मारवाडी लोक तुमच्यासोबत आहोत. जो कोणी मराठी भाषेचा अपमान करेल, त्याच्याविरोधात तुम्ही भूमिका घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगून त्यांनी मराठी लोकांची माफीही मागितली.


