
Jitendra Awhad On Kalyan-Dombivli Meat Ban : आव्हाडांचा पालिकेला थेट इशारा; आयुक्त निर्णयावर ठाम
कल्याण: स्वातंत्र्यदिनानिमित्त (15 ऑगस्ट) कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. Kalyan-Dombivli Meat Ban या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी तर थेट पालिका प्रशासनाला इशारा देत ‘मी 15 ऑगस्टला मटण पार्टी ठेवणार आहे, कोण मला अडवणार?’ असा सवाल केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी 1987 च्या एका जुन्या शासन निर्णयाचा आधार घेत हा आदेश काढला आहे. यानुसार 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कत्तलखाने आणि मांस विक्री बंद राहणार आहे.
या निर्णयावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “शहरात मांस खाण्यावर बंदी नाही, तर फक्त विक्रीवर बंदी आहे.” त्यांनी प्रशासनाचा हा निर्णय कायम असल्याचे ठामपणे सांगितले.
दरम्यान, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पदाधिकारी संजय जाधव यांनी आयुक्तांना निवेदन देऊन हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) नेते आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयावर टीका केली असून, हा निर्णय घेणाऱ्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला आहे.


