
Avinash Jadhav : मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
ठाणे :- ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या 31 जुलै रोजी झालेल्या निवृत्तीनंतर त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन शिनगारे यांनी निवृत्तीपूर्वी राजकीय दबावाखाली अनेक महत्त्वाच्या फायलींवर सह्या करून त्या मंजूर केल्याचा दावा केला आहे. जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
लोढा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अविनाश जाधव यांनी आपल्या आरोपांमध्ये राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे नाव घेतले आहे. जाधव म्हणाले, “आमच्याकडे माहिती आहे की, 31 जुलै रोजी लोढा यांनी शिनगारे यांच्या घरी जाऊन दोन फाईल्स मंजूर करून घेतल्या. लोढा हे ठाणे जिल्ह्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल, तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. लोढा जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी का गेले होते, याचीही चौकशी झाली पाहिजे.”
मनसेच्या मते, अशोक शिनगारे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक फाईल्स प्रलंबित ठेवल्या होत्या. मात्र, निवृत्तीच्या शेवटच्या दोन दिवसांत त्यांनी केवळ सह्या करण्याचे काम केले. जाधव यांनी यावर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “इतकी वर्षे ते ठाण्यात होते, तेव्हा त्यांनी या सह्या का नाही केल्या? निवृत्तीच्या तोंडावरच इतक्या घाईघाईत निर्णय का घेण्यात आले?”
राज्यात सत्ता बदलल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी पदावर अशोक शिनगारे यांची नियुक्ती झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिनगारे यांची नियुक्ती तेव्हाही चर्चेचा विषय ठरली होती. राजेश नार्वेकर यांची बदली करून त्यांची जागा शिनगारे यांनी घेतली होती. आता त्यांच्या निवृत्तीनंतर झालेल्या या आरोपांमुळे ठाणे जिल्हाधिकारी पद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


