Kalyan Train Accident : कल्याणजवळ रेल्वेतून पडून शेतकऱ्याने गमावला पाय

•Kalyan Train Accident News : चोरट्याने लोखंडी पट्टीने मारले, मोबाईल हिसकावून पळून गेला; गंभीर घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याण :- कल्याण जवळील शहाड-आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांनी डोके वर काढले आहे. तपोवन एक्सप्रेसच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करणाऱ्या नाशिकच्या एका शेतकऱ्याच्या हातावर अल्पवयीन चोरट्याने लोखंडी पट्टीने जोरदार फटका मारला. या घटनेत तोल जाऊन खाली पडल्याने संबंधित शेतकऱ्याला आपला एक पाय गमवावा लागला आहे. चोरट्याने त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला आहे.
या घटनेमुळे शहाड, आंबिवली आणि विठ्ठलवाडी रेल्वे मार्गालगत चोरट्यांचा सुळसुळाट पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे लोखंडी सळई किंवा पट्टीने प्रवाशांच्या हातावर मारून मोबाईल आणि पाकीट हिसकावून पळून जाण्याच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त नेहमीच असते, असे असतानाही ही घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय घडले नेमके?
नाशिक येथील शेतकरी गौरव रामदास निकम (वय 22) हे मुंबईतील कामे आटोपून रविवारी तपोवन एक्सप्रेसने नाशिकला परत जात होते. ते एक्सप्रेसच्या दरवाजाजवळ उभे राहून मोबाईलवर बोलत असताना शहाड-आंबिवलीदरम्यान रेल्वेचा वेग कमी झाला. त्याच वेळी रेल्वे मार्गाजवळ उभ्या असलेल्या एका अल्पवयीन चोरट्याने त्यांच्या हातावर लोखंडी पट्टीने जोरदार फटका मारला. हाताची पकड सुटल्याने गौरव निकम एक्सप्रेसमधून खाली पडले आणि त्यांचा एक पाय रुळाखाली आल्याने त्यांना तो गमवावा लागला. त्यांना दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे.
चोरट्याने त्यांचा मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन लगेच पळ काढला. लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ गौरव निकम यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या परिसरातील गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. या गंभीर घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


