Sharad Pawar : “पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी लादणं योग्य नाही”शरद पवारांचे स्पष्ट मत; हिंदीबाबत राष्ट्रवादीची मवाळ भूमिका

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर अद्याप स्पष्ट भूमिका नाही
कोल्हापूर | महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यात चांगलाच राजकीय गदारोळ पाहायला मिळतो आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची हाक दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पवार म्हणाले, “पहिली ते चौथी या वयोगटासाठी हिंदी सक्ती अयोग्य आहे. मातृभाषेचा पाया मजबूत करणं या वयात महत्त्वाचं आहे.” मात्र त्याचवेळी त्यांनी पाचवीनंतर हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचंही नमूद केलं.
कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. देशात 55 टक्के नागरिक हिंदी भाषिक असल्यामुळे ही भाषा दुरावता येणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.
पवार म्हणाले, “मुलांच्या मनावर लहान वयात दुसरी भाषा लादणं योग्य नाही. पण पुढील शैक्षणिक टप्प्यावर हिंदी शिकणं त्यांच्याच फायद्याचं आहे.”
राज आणि उद्धव ठाकरे यांनी 5 जुलै रोजी संयुक्तपणे हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, “हा मोर्चा कोणत्याही राजकीय झेंड्याखाली नसेल. मराठीसाठी बोलणाऱ्या सगळ्यांनी रस्त्यावर उतरावं.”
यावर विचारणा होताच, शरद पवारांनी मोर्चामध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही. मात्र, त्यांनी या मुद्द्यावर तटस्थ आणि समजूतदार दृष्टिकोन मांडल्याचं स्पष्ट होतं.


