
Sharad Pawar : द्वेष करून चालणार नाही, निर्णय विद्यार्थ्यांचा असावा”
पुणे | राज्यात हिंदी भाषेसंदर्भातील शालेय जीआरवरून वादाच्या फैऱ्या रंगल्या असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी यावर आपली संतुलित भूमिका मांडली आहे. “हिंदी शिकणं हे संवादासाठी महत्त्वाचं आहे, पण त्याची सक्ती करणे योग्य नाही,” असे मत त्यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
“हिंदीचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. कोणी शिकू इच्छित असेल, तर त्यास विरोध का करायचा? मात्र, कोणावरही भाषा शिकण्याची सक्ती करू नये. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी यावर निर्णय घ्यावा,” असे स्पष्ट मत शरद पवारांनी नोंदवले.
हिंदी सक्तीच्या जीआरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला रोखठोक इशारा दिला असताना, शरद पवार यांनी द्वेष आणि सक्ती यामधील सीमारेषा स्पष्ट करत, विद्यार्थ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले आहे. “देशातील 55-60 टक्के जनता हिंदी बोलते. संवादासाठी ही भाषा उपयुक्त असली तरी ती लादणं टाळावं,” असेही त्यांनी म्हटले.
निवडणुकांपूर्वी आघाडीची हालचाल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणाले, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तीन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र बसून चर्चा करणार आहोत. विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची ताकद आहे, त्यामुळे त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल.”
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मध्यरात्री उघडण्यावर शंका व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीवेळीही रात्री 2 वाजता ही बँक उघडली गेली होती. हे आता पुन्हा घडलं. कोणत्याही सूचनेशिवाय कर्मचारी बँक उघडू शकत नाहीत. यामागे काहीतरी वेगळं नक्की आहे.”



