पुणे
Trending

इंद्रायणी नदीवर भीषण दुर्घटना: कुंडमळा पूल कोसळला, अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती

Pune Bridge Collapsed News : राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत; सेल्फीमुळे जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन

पुणे, मावळ | पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी नदीवर कुंडमळा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. मुसळधार पावसामुळे पाण्याने खचलेल्या जुन्या पुलाचा एक भाग कोसळला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुमारे ३० ते ४० जण नदीच्या प्रवाहात अडकले किंवा वाहून गेले असावेत, अशी प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरा चार मृतदेह सापडल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात पावसाचा जोर कायम असून इंद्रायणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे बचाव कार्य अधिक अवघड झाले आहे. एनडीआरएफ, पोलीस व अग्निशमन दलाच्या पथकांकडून रात्रीपासून शर्थीचे बचावकार्य सुरू आहे. नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर शोधमोहीम राबवली जात आहे.

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असून, जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च शासन उचलणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पुलावर सेल्फी घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्यामुळेच पुलावर अतिरिक्त ताण पडला, अशी माहितीही त्यांनी दिली. “पर्यटकांनी आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी. केवळ सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणे धोकादायक आहे,” असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला.

संपूर्ण राज्यभरातून या दुर्घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, पूरस्थितीत अशा धोकादायक भागांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत 32 जण जखमी – मुख्यमंत्री

पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आतापर्यंत 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

अमित शाहांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, कुंडमळा दुर्घटनेची माहिती घेतली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पुण्यातील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेची माहिती घेतली. मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0