Aaditya Thackeray : सण साजरे करा, सरकार हस्तक्षेप करू नये” – आदित्य ठाकरे यांचा कटाक्ष
•बकरीदच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय तापमान वाढले आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली जोरदार टीका; गौसेवा आयोगाच्या आदेशामुळे आंदोलनाची भीती
मुंबई :- देशभरात 7 जून रोजी बकरीदचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मात्र, या सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा वादळ उठले आहे. बकरीदाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गौसेवा आयोगाने 3 जून ते 8 जून दरम्यान राज्यातील पशु बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. या आदेशामुळे खास करून ग्रामीण भागातील पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला.
या विवादावर शिवसेना (ठाकरे)च्या आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या अशा निर्णयांवर कटाक्षाने टीका करत म्हटले की, “प्रत्येक सणाच्या वेळी सरकारने काही ना काही बचत करण्याची मागणी का करावी? सण तुम्ही साजरे करा, पण सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये.” आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “मीही पर्यावरणप्रेमी आहे, पण कधी पाणी वाचवा, कधी रंग वाचवा, आता हे बचावण्याचे नियम इतके का वाढवायचे? सण साजरे करायला हवा, पण श्वास घेण्याची पण मुभा द्यावी.”
आदित्य ठाकरे यांनी सरकारला आवाहन करत सांगितले, “शासनाने आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांना मदत करणे, घरात पाणी शिरले तर त्याची योग्य ती दखल घेणे, आणि पाकिस्तानहून आलेल्या चार दहशतवाद्यांना पकडणे हाच मुख्य काम आहे, पण सणांमध्ये अडथळे आणणे हे शासनाचे काम नाही.”
गौसेवा आयोगाच्या आदेशामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. पशुपालकांच्या आर्थिक हितासाठी आणि सणाच्या पारंपरिक महत्त्वासाठी बाजार उघडे ठेवण्याची मागणी केली गेली होती. या मागणीनंतर आयोगाने आपला आदेश मागे घेतल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात सण साजरे करण्याच्या आनंदात अशा राजकीय वादांमुळे वातावरण तापलेले आहे. मात्र, आता गौसेवा आयोगाच्या आदेशाला मागे घेण्यात आल्यामुळे सण आनंदात पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



