मुंबई
Trending

Panvel News : जातीचा दाखला मिळवण्यात अडचणी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा – भिमशक्ती संघटनेची मागणी

Panvel Latest News : 1950 पूर्वीचे दस्तऐवज बंधनकारक असल्याने अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना दाखला मिळवण्यात होत आहे अडथळा,समाज मंदिरांमध्ये दोन मजली इमारती उभारण्याचीही मागणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

पनवेल – रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये, विशेषतः पनवेल आणि उरण तालुक्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जातीचा दाखला मिळवण्यासाठी 1950 च्या आधीचे पुरावे अनिवार्य असल्यामुळे अनेकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या काळात समाजात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या नोंदी सरकारी स्तरावर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आजही त्या समाजाकडे आवश्यक दस्तऐवज उपलब्ध नाहीत.

या परिस्थितीत बदल करून नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी भिमशक्ती संघटनेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये दाखल्यासाठी असलेली 1950 च्या पुराव्यांची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून समाजातील नागरिकांना जातीचा दाखला सहजपणे उपलब्ध होईल.

तसेच पनवेल तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या समाज मंदिरांमध्ये दोन मजली इमारती बांधून देण्याची मागणीही करण्यात आली. या मंदिरांचा उपयोग समाज कार्यासाठी, बैठकींसाठी आणि विविध उपक्रमांसाठी करण्यात येतो.

हे निवेदन भिमशक्ती संघटनेचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड, पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड आणि पोलीस पाटील प्रदीप जाधव यांनी दिले.

या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी जावळे यांनी यासंदर्भात पुढील महिन्यात प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या उपक्रमामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांना न्याय मिळेल आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0