मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून शहरासोबतच समुद्र किनाऱ्यांचीही सुरक्षामध्ये वाढ

•भारत – पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी पोलीस सुरक्षा वाढवली पोलीस घालणार समुद्रात गस्ती
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून शहरासोबतच समुद्र किनाऱ्यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.आयुक्तालयाच्या चार विशेष पोलीस बोटी समुद्रात सतत गस्त घालत असून, संशयास्पद बोटींवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तर किनारपट्टीच्या भागात ही गस्त घातली जात आहे.
आयुक्तालयाकडे सध्या 17 टन आणि 19 टन क्षमतेच्या चार बोटी आहेत. या बोटींचा वापर सागरी हद्दीत गस्त घालण्यासाठी, गुन्हेगारांचा पाठलाग करण्यासाठी तसेच मदत व बचाव कार्यासाठी केला जातो.अलीकडच्या काळात भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावरील शहरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र मार्गे घातपात घडवण्याची शक्यता लक्षात घेऊन, आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सुरक्षाव्यवस्थेत अधिक बळकटी आणण्याचे आदेश दिले आहेत.मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्तन, अर्नाळा आणि वसई सागरी पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे


