मुंबई

Raj Thackeray : मरणोत्तर “भारतरत्न” घोषित व्हायला हवं! राज ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

•रतन टाटा यांना भारतरत्न मिळावे यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

मुंबई :- उद्योग विश्वातील आणि भारताच्या औद्योगिक जडणघडणीत अतिशय महत्त्वाचे योगदान असलेले टाटा समुदायाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर सर्व राजकीय पक्षांनी केंद्र सरकारकडे तसेच राज्य सरकारकडे रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे असे आग्रही धरू लागले आहे. राज्य सरकारने आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये रतन टाटा यांना भारतरत्न मिळावे म्हणून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने प्रस्ताव मंजूर केला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी पत्र द्वारे केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र
प्रति,
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी,

सस्नेह जय महाराष्ट्र,

ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून ?

त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.

तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला.
आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.

राज ठाकरे ।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0