महाराष्ट्र
Trending

Raj Thackeray on Ratan Tata :मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली!

Raj Thackeray on Ratan Tata : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी रतन टाटा यांनी नाशिक उद्यानाला दिलेला सीएसआर मधून किस्सा सांगितला

मुंबई :- भारतीय उद्योगपती जगात नाव लौकिक केलेले टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा Ratan Tata यांनी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. राज ठाकरे Raj Thackeray  यांनी नाशिक येथील उभारण्यात आलेल्या बोटॅनिकल उद्यानाला रतन टाटा यांनी सी एस आर मधून दिलेल्या निधीचा किस्सा सांगत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक वर दोन पोस्ट शेअर करत रतन टाटा यांनी टाटा समूहाचा कशाप्रकारे विकास केला तसेच राज ठाकरे यांचे जवळके कशाप्रकारे आहे हे सर्व सांगितले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या फेसबुक वरील पोस्ट

रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी.
बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं.

रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि ‘लायसन्स राज’शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की ‘लायसन्स राज’ संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले.

भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती.

पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली.

स्वतःच छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न, हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी ‘नॅनो’ गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना, सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहित होती. सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच.

माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या ‘बोटॅनिकल उद्याना’साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला.

बोटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते.

रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की ‘बॉंबे हाऊस’ हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या ‘टॅंगो’ आणि ‘टिटो’ या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं.

आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा ‘कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक’ गमावला, हे त्याहून मोठं दुःख.

छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब.

रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

नाशिक बोटॅनिकल उद्यानासाठी टाटा समूहाच्या सीएसआर मधून निधी

नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात, आम्ही अनेक प्रकल्प सीएसआर निधीतून उभारले. आणि नाशिक सुंदर करावं म्हणून ज्या ज्या कल्पना मी देशातील नामवंत उद्योजकांसमोर मांडल्या, त्या प्रत्येकाने मला तात्काळ होकार दिला. नाशिकमध्ये एक बोटॅनिकल उद्यान सुरु करावं अशी माझी इच्छा होती, त्यासाठी मी रतन टाटांना सीएसआरमधून निधी द्यावा अशी विनंती केली आणि त्यांनी मला लगेच होकार दिला. इतकंच नाही सुरुवातीला जो निधी मंजूर केला त्यापेक्षा अधिक निधी काम वाढतंय म्हणून लागणार आहे हे पाहून, तो निधी पण मंजूर केला.

बोटॅनिकल उद्यान पूर्ण झाल्यावर मी रतन टाटांना विनंती केली तुम्ही स्वतः या उद्यानाला भेट दिलीत तर उत्तम होईल. खरंतर जागतिक पातळीवर काम करणारे उद्योगपती असं सहजासहजी कुठे जात नाहीत, पण रतन टाटा नाशिकला आले. त्यांनी आम्ही उभारलेलं उद्यान पाहिलं. आणि नंतर माध्यमांशी बोलताना, माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमध्ये कौतुक होतं, पण मला तो त्यांनी दिलेला आशीर्वाद वाटला. मी भाग्यवान आहे रतन टाटांसारख्या अनेक दिग्गजांनी मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेची ही चित्रफीत, जरूर पहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0