Pritam Mhatre : दाऊदला भर चौकात फाशी द्या ; शेतकरी कामगार पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी
•यशश्री शिंदे हत्याकांडानंतर विविध संघटने कडून न्यायासाठी कॅन्डल मार्च
पनवेल :- नवी मुंबईत उरणमध्ये 25 जुलै दरम्यान यशश्री शिंदे नावाच्या 22 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता. अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यशश्री शिंदे च्या कुटुंबीयांची आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन करतानाच आरोपीला फक्त फाशीच नाही तर ती भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी कोणी धजावणार नाही अशा प्रकारची तीव्र शब्दात भावना त्यांनी व्यक्त केली.
“अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या”
रविवारी, उरण मधील नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात ते सहभागी झाले होते. गंभीर विषयात बोलताना त्यांनी सांगितले अशा प्रकारचे घटना घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजची तरुण पिढी नशेच्या अधीन झाली आहे. उरण-पनवेल परिसरात सर्रासपणे गांजा आणि इतर नशेडी पदार्थ तरुणांना सहज उपलब्ध होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यावर लवकरच उपाययोजना सरकारने करणे अपेक्षित आहे. तर त्यांनी अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या परिसरात आत्ताही घडत असतील मी अशा सर्व तरुणी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही दडपणाखाली न राहता आपण ते पोलिसांशी संपर्क साधून आपल्या समस्या व्यक्त कराव्या. जेणेकरून अजून नवीन दाऊद शेख तयार होण्याच्या अगोदरच ठेचला जाईल. अशा अडचणीच्या वेळी पोलीस प्रशासना सोबतच आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत आमच्याशी कधीही संपर्क साधा. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून आरोपीच्या मुस्क्या आवळल्या त्याबद्दल त्यांचेही आभार. मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे त्याला फाशीच मिळेल ही आमची मुख्य मागणी पूर्ण होईल.
चहाच्या टपऱ्यांवर सर्रास गांजाची विक्री
नशेच्या अधीन होऊन तरुण पिढी बिघडत आहे. मानखुर्द गोवंडी येथून हे अंमली पदार्थ विक्रेते रेल्वेने येतात आजूबाजूच्या परिसरातील ठराविक चहा-पान टपऱ्या, इस्त्रीवाले, ठराविक नाके या ठिकाणी चरस गांजा तरुणांना उपलब्ध करून देतात. प्रथमतः हे अड्डे उध्वस्त केले पाहिजे. आम्ही स्वतः नवीन पनवेल, अमेटी कॉलेज, खारघर, उलवे नोड पासून सुरुवात केली आहे. नागरिकांना मी आवाहन करीन आपल्या नजरेस असे काही आढळल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा आपण कायद्याच्या चौकटीत ते उध्वस्त करण्याचा पूर्ण बंदोबस्त करू जेणेकरून आपली तरूण पिढी भविष्यात व्यसनाधीन होणार नाही.