मुंबई

Supriya Sule : शपथविधीपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या.. शरद पवारांच्या शिकवणीची दिली आठवण..

•मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रवेश करते तेव्हा तेव्हा साहेबांचे वाक्य… सुप्रिया सुळे

मुंबई :- बारामती लोकसभा निवडणुक अतिशय चुरशीची आणि संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सलग चौथ्यांदा लोकसभेवर आपला विजयाचा झेंडा रोवला आहे. शपथविधीपूर्वीच सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या वाक्यांची आठवण करून देत एक ट्विट केले आहे. मी जेव्हा जेव्हा संसद भवनाच्या पायऱ्या चढते तेव्हा तेव्हा शरद पवारांनी दिलेली शिकवण मला आठवण करून देत असते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या ट्विट जशास तसं..
लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्या वेळी निवडून देऊन मला लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. हि माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. कृतज्ञतापूर्वक हे नमूद करते की, माझ्यावर मतदारांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. मला आजही लक्षात आहे की, जेंव्हा मी २००९ साली पंधराव्या लोकसभेत पहिल्यांदा खासदार म्हणून पाऊल ठेवले तेंव्हा आदरणीय पवार साहेब यांनी मला एक शिकवण दिली. ते म्हणाले होते की,

“सुप्रिया, तु खासदार म्हणून चालली आहेस. गेट नंबर एक ने आत जाऊन लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस. एक कायम लक्षात ठेव की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे तुला ही संधी मिळाली आहे. दरवेळी पायऱ्या चढताना याची जाणिव ठेव.”

मी जेंव्हा जेंव्हा संसदेत प्रवेश करते तेंव्हा तेंव्हा साहेबांची हि वाक्ये मला आठवतात. या निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा लोकांच्यावरील असलेला विश्वास अधिक दृढ झाला. आपण योग्य मार्गावर असाल तर लोक तुम्हाला आयुष्यभर साथ-सोबत करतात याचाही प्रत्यय आला. हि खासदारकी जनतेच्या कामासाठी आहे, पुढील पाच वर्षांतील प्रत्येक क्षण हा केवळ जनतेसाठी आणि जनहिताच्या कामासाठी गेला पाहिजे याकडे माझा कटाक्ष असणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हा सर्वांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा आदर्श घालून दिला आहे. हे सुत्र कायम डोळ्यांसमोर ठेवून चालण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते.

सलग चौथ्या वेळी संसदेत प्रवेश करीत असताना मला वाढत्या जबाबदारीची जाणिव आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिल. लोकहिताचे मुद्दे संसदीय चौकटीत राहून मात्र अत्यंत आग्रही पणे सभागृहात मांडून त्याची तड लावण्यासाठी मी सदैव कार्यरत असेन. लोकांनी माझ्यावर वेळोवेळी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी यापुर्वी देखील मी अविरतपणे काम केले आहे. हा वसा यापुढील काळात देखील कायम राहिल, हे वचन यानिमित्ताने देते.

या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.या निवडणूकीत प्रचारासाठी अक्षरशः जीवाचे रान करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, विविध राजकीय संघटना यांसह सर्व सहकारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतमंडळी, प्रिंट-टिव्ही-इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्वच हितचिंतक सर्वांचे मनापासून आभार. यापुढील काळातही आपले सहकार्य असेच मिळत राहील ही अपेक्षा.
धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0