12th Exam : उद्यापासून बारावीचा ‘रणसंग्राम’; 15 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा, शिक्षण मंडळाची ‘कॉपीमुक्ती’साठी कंबर कसली!

12 th Exam Latest News : राज्यातील 3,387 केंद्रांवर होणार परीक्षा; 271 भरारी पथके तैनात तर 172 संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष; ‘अर्धा तास आधी हजर राहा’— मंडळाचे आवाहन
पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बारावीची (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षा उद्या, 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी यंदा राज्यातील 15 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेच्या या महाकुंभासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यार्थी संख्येचे गणित आणि विभागीय सज्जता
यंदा नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 20 हजार 229 मुले, 7 लाख 12 हजार 240 मुली आणि 18 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील 9 विभागीय मंडळांमार्फत (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) एकूण 10 हजार 664 कनिष्ठ महाविद्यालयांमधून ही परीक्षा पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी राज्यात 3 हजार 387 मुख्य केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत..
‘कॉपीमुक्त’ अभियानाचा कडक पहारा
परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त होण्यासाठी मंडळाने यंदा कडक पावले उचलली आहेत. संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली असून ती परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देतील. बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मात्र, ज्या 172 केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नाही, तिथे पारदर्शकता राखण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ड्युटीमध्ये वेळोवेळी बदल करण्याची रणनीती मंडळाने आखली आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि समुपदेशन
परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने यंदा समुपदेशकांची संख्या वाढवली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच, परीक्षा काळात कोणताही अडथळा येऊ नये, विशेषतः वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला आहे.


