10th Exam : राज्यात आजपासून 10 वीच्या परीक्षेचा शंखनाद! 16 लाख विद्यार्थी भवितव्यासाठी सज्ज; गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा ‘कडक वॉच’

10th Exam Started From Today : 271 भरारी पथके, संवेदनशील केंद्रांवर शिक्षकांची अदलाबदल; सीबीएसईचा ‘वर्षातून दोनदा परीक्षा’ बाबत मोठा नियम जाहीर
पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (MSBSHSE) इयत्ता 10 वीची परीक्षा आजपासून राज्यभरात सुरू होत आहे. 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी सज्ज झाले असून, परीक्षा केंद्रांवर उत्साहाचे आणि तितकेच तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कॉपी किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
विद्यार्थी संख्येचे गणित आणि विभागवार नियोजन
यंदा राज्यातील 9 विभागांतून एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये मुलांची संख्या 8 लाख 65 हजार 750 असून, 7 लाख 42 हजार 736 मुली परीक्षेला बसल्या आहेत. विशेष म्हणजे 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनीही आपली नोंदणी केली आहे. राजभरातील 5 हजार 111 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.
कॉपी बहाद्दरांवर ‘कडक वॉच’
गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने विशेष रणनीती आखली आहे:
भरारी पथके: राज्यात एकूण 271 भरारी आणि बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
संवेदनशील केंद्रे: राज्यातील 191 केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. ज्या 42 संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत, तिथे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
झेरॉक्स बंदी: परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
विशेष मुभा: पुण्यातील दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना लॅपटॉप वापरण्याची विशेष परवानगी मंडळाने दिली आहे.
CBSE कडून वर्षातून दोनदा परीक्षेचा नवा नियम
महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा सुरू होत असतानाच, CBSE बोर्डानेही परीक्षेच्या नियमांबाबत मोठी स्पष्टोक्ती दिली आहे. सीबीएसई आता वर्षातून दोनदा परीक्षा घेणार असली, तरी पहिली परीक्षा देणे सक्तीचे करण्यात आले आहे.
जर एखादा विद्यार्थी पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिला, तर त्याला दुसऱ्या परीक्षेची संधी मिळणार नाही. तसेच, किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना पुढील वर्षीच मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कमाल तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्यासाठी (Improvement) दुसरी परीक्षा देता येईल.



