जितेंद्र आव्हाडांना चॅलेंज देणाऱ्या सहर शेख पोलिसांच्या कचाट्यात! ‘मुंब्रा हिरवं करण्याच्या’ विधानानंतर नोटीस जारी; सामाजिक सलोखा राखण्याचे आदेश

•एमआयएमच्या विजयानंतर आव्हाडांना विचारला होता ‘कैसा हराया?’; आता वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणी वाढल्या; पोलिसांनी बजावली ताकीद
मुंब्रा l राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा या बालेकिल्ल्यात एमआयएमच्या (AIMIM) तिकीटावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या सहर शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी केलेले एक प्रक्षोभक विधान त्यांच्या अंगलट आले असून, मुंब्रा पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर सहर शेख यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आणि आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. विजयानंतर त्यांनी “कैसा हराया?” असे म्हणत जितेंद्र आव्हाडांना डिवचणारा व्हिडिओ व्हायरल केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी “मुंब्र्याला हिरवं करायचं आहे” असे विधान केल्याचा आरोप आहे. या विधानामुळे समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो आणि धार्मिक सलोखा बिघडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मुंब्रा पोलिसांची ‘नोटीस’ सहर शेख यांच्या भाषणाची गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 168 नुसार नोटीस बजावली आहे. “ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल किंवा दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, असे कोणतेही भाषण करू नये. तसेच सोशल मीडियावर बोलताना संयम राखावा,” असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी या नोटीसद्वारे दिले आहेत.
राजकीय संघर्षाला नवे वळण मुंब्र्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (ज्यात ठाकरे गट आणि मनसेही होते) असा सामना असताना सहर शेख यांनी एमआयएमकडून मारलेली धडक चर्चेचा विषय ठरली होती. निष्ठावंतांना डावलून युती धर्मामुळे अनेकांचे तिकीट कापले गेल्याचा फटका आव्हाडांना बसला असतानाच, आता सहर शेख यांच्यावर झालेल्या या पोलीस कारवाईमुळे मुंब्र्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.


